मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

एसटीडी बुधवरचे घोळ.... ऑफर

एसटीडी बुधवरचे घोळ.... ऑफर
पुढची दोन वर्ष कॉलेजमध्ये मी अतिशय नाकापुढे काढली. होस्टेलवर असताना नोकरीही करता येत नव्हती. पण तरीही तीन चार महिने मी एके ठिकाणी नोकरी केली. चंदन टेली शॉपी म्हणून एका माणसाचे नऊ एसटीडी बुथ होते. गुड लक चौक, जंगली महाराज रस्ता, सातारा रोड अशा ठिकाणी हे बूथ होते. या बुधवार मी चार तास थांबायचो. हि सगळी ड्यूटी दिवसा म्हणजे बारानंतर पुढे आणि रात्री दहाच्या आधी असेल असा माझा कटाक्ष असायचा. कारण रात्री दहानंतर होस्टेलचे दार बंद व्हायची. सकाळी बारापर्यंत कॉलेज असायचे. या मधल्या काळात चार तास काम केले तर महिन्यानंतर चारशे रुपये मिळायचे. तसा हा सौदा बरा होता मात्र माझे मन इथेही रमले नाही. त्याचे कारण असे की इथे काम करण्यात एक चोरटेपणा होता. मी पहिलीच एक गोष्ट लपवीत होतो ती म्हणजे माझ्या लग्नाची. त्यानंतर पुन्हा अशा काही होस्टेलच्या लोकांपासून तोंड दडवून काम करायचे म्हणजे अवघड व्हायचे. एकदा निखिल गाडगीळने मला सांगितले, आर. व्ही. विचारत होते की तू बाहेर काम करतोस का? याचा अर्थ त्यांनी मला कुठेतरी बूथवर बघितले असणार, पण त्यांनी कधीच विचारले नाही. मलाही या सगळ्या बाबींचे फार वाटत नव्हते. आपण होस्टेलचा नियम मोडतो, एवढे मात्र मला माहित होते. मात्र तशा समाजात अनेक गोष्टी चालतात. आपणच आपल्यासाटी काही केले तर बिघडले कुठे असे मला वाटायचे. मी या बुधवरची नोकरी सोडली. त्याला कारण तिथे ज्या पद्धतीने काम चालायचे, त्याने आपण कधीतरी अडचणीत येऊ असे वाटायचे. एसटीडी, आयएसडी कॉलचे जितके पैसे व्हायचे, त्याच्या दीडपट किंवा दुप्पट रक्कम आम्ही संबंधित गिऱ्हाईकाकडून वसूल करायचो. हे सगळे अतिशय बेमामूल चाललेले असायचे. आपले पैसे जादा गेले हे फोन करावयास येणाऱ्याला कळायचं मात्र रकमेचा डिस्प्ले तशीच रक्कम दाखवायचा. त्यासाठी मशिनधील फंक्‍शन आम्ही बदलायचो. म्हणजे त्यावेळी पुणे- मुंबई एसटीडी कॉलचा दर आठ सेंकदाला एक पल्स म्हणजे सव्वा रुपया इतका होता. आम्ही फंक्‍शन बदलून सहा किंवा चारच सेकंदाला एक पल्स पडेल, असे सेटिंग करायचो. उरलेली रक्कम काढाण्यासाठीचे सेटिंगही आम्ही शिकून घेतलेले होते. आयएसडी कॉलवाला आला की फारच मजा यायची. साधारण एक किंवा सव्वा सेकंदाला अमेरिकेला एक पल्स पडायचा. आम्ही तो अर्ध्या सेंकदावर आणून सोडायचो. धडाधडा एक मिनीट फोनवर बोलले की त्याचे बिल शंभर दोनशेकडे जायचे. त्यामुळे मिळणारी रक्कमही बरीच असायची. समजा एखाद्याने त्यात बिल मागितले तर आम्ही मशिनवरचे बिल देत नसायचो. त्यासाठी स्वतंत्र बिल बुक होती. त्यातले बिल आम्ही द्यायचो. त्यात किती वेळ बोलणे झाले आणि किती पल्स झाले असा तपशील नसायचा. फक्त नंबर आणि त्यावर बिल असे अडचणीत न येणारे आम्ही लिहून द्यायचो. रोज निदान पाच सहा लोकांना तरी जादा बिल झाले म्हणून तोंडाला तोंड द्यावे लागायचे. पूर्णवेळ हे काम करणारे त्यावेळी दोन तीनशे रुपये तरी असे वरचे काढायचे. मला हे पटत नव्हते, तरीही जास्त पैसे मिळतात तर ते कशाला सोडा या पद्धतीने मी काम करायचो. हे काम मी साधारण चार महिने केले. या बुथच्या मालकाचा काम सोडणाऱ्या मुलाचा शेवटच्या महिन्याचा पगार द्यायचा नाही, असा एक प्रघात होता. माझा शेवटच्या महिन्याचा दोनशे रुपये पगार मी फार भारी पद्धतीने मिळविला. सावरकर भवनच्या पुढे महापालिकेच्या शेजारी त्यांचे ऑफिस होते. मी गेलो.
ते म्हणाले, "कशाला आला?' काम का सोडले?
मी म्हणालो, " माझा पगार राहिलाय?
ते म्हणाले, "आता कुठे मिळणार तो? पैसे देऊ नंतर.
मी म्हणालो, "मला पैशाची गरज आहे. आत्ताच पाहिजे.'
ते म्हणाले, ""काम का सोडतो? काम सोडणाऱ्यांना आम्ही पगार देत नसतो, हे तुला माहित नाही का?
मी म्हणालो, "तुमच्याकडे काम करुन काय मार खाऊ का? पोर काय करतात ते तुम्हाला माहित नाही का?'
ते म्हणाले काय करतात. मी काहीबाही बोलत राहिलो. त्यांनी त्यांच्या पीएला कार्ड काढायला सांगितले. माजी हजेरी बघितली. माझा बेडरपणा बघून ते म्हणाले, "चल आता तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, उद्यापासून तुला सुपवायझर म्हणून काम करायचे.'
मी म्हणालो, "मला जमणार नाही.'
तुम्ही असेच रे, काही करणार नाही आयुष्यात. कुठेतरी सरकारी नोकरीत खर्चेघाशी करत राहणार. मी म्हणालो, "तुम्ही बघा दहा वर्षांनी मी बरेच कायकाय केलेले असेल.' बघतो रे जा,' असे म्हणून त्यांनी माझे सव्वादोनशे रुपये हजेरी बघून दिले.
हे पैसे मी ज्या पद्धतीने मिळविले ते बघून बुधवरची त्यावेळची पोर म्हणायचे, "तुला मानले राव, तू थेट चंदनशीच टक्कर घेऊन तुझे काम करुन घेतले.' 

२ टिप्पण्या: