शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

महिन्यात वाढते दहा किलो वजन


         
                             गंगावेस तालमी
कोल्हापूरचे वातावरण चांगले आहेच पण तिथला तालमीतला आहार हाही तब्बेत चांगली होण्याला कारणीभूत असतो. एकादा गावाकडचा पोरगा कोल्हापुरात तालमीसाठी गेला तर पहिल्या महिन्यात त्याचे वजन साधारण आठ दहा किलो वाढते. त्याचे कारण आहारात झालेला फरक हे असते. तालमीतला आहार जबरदस्तच असतो. ज्याने त्याचा अनुभव घेतला त्याला त्याचे असाधारणपण आपोआप कळते. सकाळी पहाटे पाचला उठून व्यायाम, पकड केल्यानंतर साधारण सातच्या दरम्यान बदामाची थंडाई किंवा सरबत पहिल्यांदा घेतला जातो. त्यानंतर मग तुपातला शिरा खाल्ला जातो. पुढे शंभर किंवा दोनशे ग्रॅम लोण्याचा गोळा आणि त्याच्याबरोबर दोन तीन केळी खायची. त्यानंतर मग तीन चपात्या आणि भाजी असे जेवण करायचे. सगळ्या भाज्या तुपात केलेल्या असतात. दुध पिण्यासाठी कट्ट्यावर जायचे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार मग एक लिटर, दीड लिटर असे दूध प्यायचे. येताना काही फळे आणायची. द्राक्षे असतील तर नुसता आतला रस खायचा. साल आणि चोथा फेकून द्यायचा. इतके सगळे उरकेस्तोवर साधारण अकरा साडेअकराचा सुमार झालेला असतो. डोळे झाकायला लागलेले असतात. दुपारी बाराला तर तालमी सगळी शांत होते. तीन साडे तीन पर्यंत सगळे झोप काढून पुन्हा उठतात. व्यायाम पकड आंघोळ झाल्यावर थंडाई किंवा लस्सी घ्यायची. आठवड्याचून चार दिवस मटण खायचे. झोपताना पुन्हा फळे आणि दूध प्यायचे. सकस खाणे आणि खच्चून व्यायम यामुळे शरीरावर तेज चढते. ताकद वाढती. पहिल्या महिन्यात जरी सात आठ किलो वजन बक्कीने वाढत असले तरी ही गती पुढे कायम रहात नाही. दुसऱ्या महिन्यात तीन चार किलो वाढते. मग पुढच्या महिन्यात आणखी थोडे कमी होते आणि मग पुढे वय वाढेल तसा शरीराला आकार येत रहातो.
कोल्हापुरात पहिल्यांदा मी राजारामपुरीतील गल्ली क्रमांक एकमधील व्यायाम शाळेत जात होतो. तिथेही लाल मातीचा आखाडा होता, परंतु तिथे लढती कुणी पकडी करीत नसायचे. सगळे व्यायामला यायचे. त्यानंतर मी गंगावेस तालमीत सहा महिने राहिले. मी अकरावीची पहिली सहा महिने गेल्यानंतर पुढच्या सहा महिन्यात गंगावेस तालमीत महादेव पांढरेला भेटायला गेलो. त्याला तुज्याबरोबर तालीमीत रहायचे असे सांगितले. माझे बोलणे बदलेले होते. त्यात एक प्रकारचा फॉर्मलपणा आला होता. त्याने ठीक आहे, ये म्हणून सांगितले. त्यानंतर मग गंगावेस तालमीत गेलो. मला चपात्या करता येत नव्हत्या. भाजी कशी करायची हे समजत नव्हते. मग मी पहिले साधारण पंधरा दिवस सकाळी भाजी, केळी आणायला जाणे, शेंगदाणे कुटून देणे असली कामे करायचो. तसे रॅंगिंग तालमीत जबरदस्त असते म्हणजे एकादे साधे पोरग असेल एकटे असेल त्याला पार कुणाचे बॅकींग नसेल तर त्याचे सगळे महिन्याचे सामान आठच दिवसात संपू शकते, अशी गंमत या वातावरणात असते. महादू पांढरेबरोबर बाळू नवलेही होता. आम्ही तिघे एकत्र करुन खायचो. तसा बाळूने आणि महादूने माझा त्रास सहन केला. या वातावरणात सेट व्हायला मोठी मदत केली. महिन्या दीड महिन्यात मी रुळलो. पुढे तालमीत जना कानतोडे, रामा कानतोडे, बाळू हवालदार अशी मंडळी आली. मग त्यांची आणि आमची जमाजमी झाली. माझा जेवणखाण करण्याचा त्रास वाढला. आमचा पाव्हणा रायचंद गावडे त्यावेळी तालमीत होता. तो खूप दिवसांपासून तिथे होता. त्यामुळे त्याचा तिथे जम बसला होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा