सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

मिरवावे असे दोस्ताचे कर्तृत्व...

मिरवावे असे दोस्ताचे कर्तृत्व...
तो माझा दोस्त आहे, यापेक्षा गेल्या दहा - पंधरा वर्षात त्याने जे कमावले ते कुणालाच पैशात मोजता येणार नाही. तो शेतीतून स्वावलंबी झाला, यापेक्षाही तो स्वाभिमानाने जगतो, हे महत्वाचे आहे. दुसऱ्यांच्या बांधाला जाणाऱ्या त्याच्या आई - भाऊला आज घरच्याच छोट्याशा शेतातले काम सरत नाही. केत्तूर (ता. करमाळा) गावात राहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची कहाणी........
-------------
यश मोजण्याचा श्रीमंती हा एक मापदंड आहे, मात्र आपण आसपास बघितले तर श्रीमंतांना यशस्वी म्हणावे का, असा प्रश्‍न पडतो. माझ्याबरोबर शिकणारे अनेकजण आज मोठमोठ्या पदांवर आहे. आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याने घडीभर मोहरुन जायला होते. पण माझ्या मनावर ठसा माझ्या केत्तूर गावातल्या आबासाहेब पांडुरंग ठोंबरे या तरुणाने उमटविला आहे. त्याला कारणही तसेच आहे. खेड्यातले आपले अभावग्रस्त आयुष्य माणूस श्रमाने कसे बदलू शकतो, याचे मला तो मूर्तीमंत उदाहरण वाटतो.
मोहोळच्या एका संस्थेतून आबा बीपीएड होऊन बाहेर पडला, त्यावेळी नोकरी करण्याची इच्छा त्याच्या मनात होती. पण वास्तव भीषण होते. कोर्ससाठी डोनेशन दिल्यावर पुन्हा नोकरीसाठी पैसे भरणे हि त्याच्या कुटुंबाच्या आवाक्‍याबाहेरची गोष्ट होती. नोकरीसाठी काही ठिकाणी प्रयत्न करुन बघितले पण अशक्‍य कोटीतल्या बाबी लक्षात आल्यावर शेतीकडे लक्ष द्यायचे त्याने ठरविले. साडेचार एकर जिरायत जमीनीचा तुकडा त्याच्याकडे होता. एक दिवस आईबरोबर रानात झाडाखाली बसल्यावर "आपण विहिर खोदू' अशी कल्पना त्याने बोलून दाखविली. "आपल्याला हे कसे शक्‍य आहे. रोजची चूल पेटविण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या बांधाला जावे लागते,' असे आईने सांगितले. पण आबा लहानपासून हट्टी. एकुलता एक मुलगा असल्यामुळे आपल्या हट्टासाठी स्वतःला किंवा आईवडिलांना किती त्रास होतो, याची कधी तमा बाळगायचा नाही. आई म्हणाली, "तू म्हणातोस तर आपल्या शेळीचे एक पाटरु विक. त्याने खोरे, घमेले, टिकाव, पार असे साहित्य घेऊन ये. आपण विहिर खोदायला सुरवात करु.' आबाने मंगळवारी राशीनला (ता. कर्जत) जाऊन बाजारातून पाटरु विकून हत्यारे आणली. भूमिपूजन झाले. आई, पत्नी यांच्याबरोबरीने आबाने विहिर खोदण्यासाठी परिश्रम सुरु केले.
विहिर दीड परसावर गेल्यावर पाणी लागले. सगळे पाणी ओढ्यात सोडावे लागत होते. आबा ज्यांना मामा म्हणतो त्या बापूसाहेब पाटील यांनी सल्ला दिली कि जेवढ्या क्षेत्राला पाणी पुरेल तिथे भुईमूगाचे पिक घे. काही पाईप त्यांनी दिले. शेंगा चांगल्या आल्या. काही भांडवल उभे राहिले. पुढे कांदा केला. चांगला भाव मिळाला. विहिरीचे काम टप्प्या-टप्प्याने सुरूच होते.
आता शेती नीट केली पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले. तीन ठिकाणी मोठ्या वगळी होत्या. तिथे बांधबंधीस्ती केली. पुढे ऊसाचे पिक लावले. स्थिती आणखी सुधारत गेली. तो रानात छप्पर बांधून रहात होता. आता आपल्या डोक्‍यावर चांगला निवारा असला पाहिजे, या दृष्टीने त्याने घर बांधले. जनावरांसाठी गोठा बांधला. शेतात आंबा, रामफळ, नारळ अशी झाडे शेतात लावली. या सगळ्या गोष्टी पुढे नातेवाईकांसह अनेकांनी मदतीचा हात दिला. त्याचबरोबर वडिलांनी काढलेले कर्ज फेडतानाही त्याला मोठा मानसिक त्रास त्याला सहन करावा लागला.
शेतीला पूरक उद्योग सुरू केल्याचे त्याचे साधारण पन्नास लिटर दूध डेअरीला जाते. त्याने गावात बचत गटात सहभाग घेऊन त्याच्या वाढीसाठी प्रयत्न केला. गावात नवी पाणी योजना झाली. बचत गटाच्या माध्यामातून त्यासाठी सरकारी पाठपुराव्यासाठीचा खारीचा वाटा आबानेही उचलला. जेऊरच्या लोकविकास संस्थेचे आनंद कोठडिया यांच्या मागदर्शनाखाली काही दिवस "सर्वात आधी शिक्षण' चळवळीचे परिसरातील गावांत सायकलवर फिरुन काम केले. माजी सरपंच अशोक पाटील यांच्या पुढाकारने स्थापन झालेल्या किर्तेश्‍वर पतसंस्थेचा संस्थापक व्यवस्थापक आहे. व्यवहार आणि परस्परसंबंध यांच्यात गल्लत करायची नाही, या अटीवर त्याने हे काम घेतले. आज अनेक पतसंस्था बंद पडत असताना या पतसंस्थेचे व्यवहार वाखाणण्याजोगे आहेत. स्वतःच्या जीवनाला आकार देताना त्याने जपलेले सार्वजनिक भानही नजरेत भरेल, असे आहे.
जमीन आपण पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित करीत असतो. तिचा पोत नीट सांभाळण्यासाठी आपण पिकांची फेरपालट करण्याबरोबरच रसायनिक खतांचा अतिवापर टाळायला हवा. काळ्या आईची सेवा केली तर ती काही कमी पडू देत नाही, असा अनुभव तो आवर्जुन नमूद करतो. गेल्या दहा-बारा वर्षांत त्याने आपल्या जीवनात परिश्रम, ज्ञान आणि स्वाभिमान या माध्यमातून केलेले परिवर्तन अनेकांना दिशा देणारे आहे. श्रमावर श्रद्धा वाढविणारे आहे.
(ताजा कलम ः हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर 2012 मध्ये आबाने स्वतःच्या अगदी छोट्या शेतीसाठी छोटा टॅक्‍टर घेतला. केळीचे ठिबक सिंचनावर पिक घेतले, त्यामुळे त्याचा कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करमाळ्यात पत्रकार संघाने गौरव केला. त्याशिवाय बारामतीत एक फ्लॅट विकत घेतला आहे.)
------------------
त्याचे यश....
----------
स्वतः विहिरीसाठी राबून जमीन बागायत केली.
शेतीची बांधबंधीस्ती केली.
चोपण जमिनीचा पोत सुधारला.
वडिलांनी काढलेले कर्ज फेडले.
दूध उत्पादनासाठी गोपालन.
सध्या 50 लिटर दूधाचे उत्पादन.
घर बांधले, दुचाकी घेतली.
पतसंस्थेत पारदर्शी कारभारासाठी मदत
एक ट्रॅक्‍टर घेतला
बारामतीत फ्लॅट घेतला
तिथे मुलीला आणि दोन्ही मुलांना शिक्षणासाठी ठेवले. 

२ टिप्पण्या: