मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

हिंदकेसरीचा खुराक

हिंदकेसरीचा खुराक
एकेकाळी कुस्ती हा माझा श्‍वास होता. त्यामुळे या क्षेत्राविषयी, पैलवानांविषयी आणि कुस्ती संघटकांविषयी मला आकर्षण राहिले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आचेगाव हे हिंदकेसरी हजरत पटेल यांचे गाव. त्याला एकदा भेट दिली आणि त्यांच्याविषयी जाणून घेतले. तो अनुभव तुमच्यासाठी दोन भागात....
सोलापूर जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास बघितला जातो. त्यावेळी आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर)चे नाव वगळताच येत नाही. (कै.) हिंदकेसरी हजरत पटेल यांचे ते गाव आहे. सोलापूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात 1938 मध्ये पटेल यांचा जन्म झाला. महाराष्ट्राचे आतापर्यंत एकूण आठ हिंदकेसरी झाले आहेत. त्यातले चौथे हिंदकेसरीपद 1967 मध्ये अहमदाबादमध्ये (गुजरात) हजरत पटेल यांनी मिळविले होते.
कुस्तीचा वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे काका चांगले पैलवान होते. त्यांचा छोटा भाऊही त्यांच्याबरोबर कुस्तीचा सराव करीत होता. एकत्र कुटुंब होते. शंभर-सव्वाशे एकर जमीन होती. त्यांचे मूळ गाव अक्कलकोट तालुक्‍यातील खानापूर होते. पण, मामाचे गाव असल्याने आचेगावात ते स्थायिक झाले होते. सराव करण्यासाठी बरोबरीचा पैलवान नाही, अशी स्थिती येताच त्यांनी कुस्ती पंढरीचा कोल्हापूरचा रस्ता धरला. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या देशातील प्रसिद्ध शाहूपुरी तालमीत त्यांनी अनेक वर्ष सराव केला. श्रीपती खंचनाळे, महंमद हनीफ आदी अनेक प्रख्यात मल्ल त्यांच्याबरोबर या तालमीत होते. त्यांचे वस्ताद मलप्पा तडाके होते.
आपल्या कारकिर्दीत हजरत पटेल यांनी शेकडो कुस्त्या मारल्या. देशभरातील मैदाने गाजविली. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. हिंदकेसरी होण्याआधी 21 मार्च 1965 मध्ये हिंदकेसरी मास्तर चंदीग्राम यांच्याबरोबर सव्वातास ते लढले होते. ही कुस्ती बरोबरीत सुटली होती. इतके मोठे नाव कमविण्यासाठी घ्यावे लागणारे कष्टही तितकेच मोठे असतात. ते रोज सकाळी दोन हजार बैठका मारत. पाच मैल धावण्याचा सराव करीत. सलग पाच-सहा जणांशी लढतीचा सराव करीत. संध्याकाळी सुमारे बाराशे दंड मारत. दोरखंडावर चढण्यासारखे अन्य व्यायामही करत. एवढा व्यायाम म्हटल्यावर त्याला खुराकही तसाच असतो. कोल्हापुरातील कोणत्याही तालमीत ज्याने काही दिवस काढलेत त्याला पैलवानांचा खुराक किती सकस असतो, हे सांगायची गरज पडत नाही. त्या व्यक्‍तीच्या आयुष्यातील तो सोनेरी काळ असतो. हजरत पटेल पाच लिटर दूध, अर्धा किलो तूप, पंचवीस मोसंबीचा रस, बदामाची थंडाई, दीड किलो मटण असा सकस आहार घेत. जे कधी लंगोट लावत नाहीत. मैदानात उतरत नाहीत, असे काही जण वस्ताद म्हणून मिरवितात. काही जण अफवा पसरविण्यात माहीर असतात, अशी खंत त्यांनी त्यावेळी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली होती. ...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा