बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

आमच्यावेळी असे नव्हते म्हणजे ......

आबा ठोंबरे म्हटले की त्याच्याबरोबर मला आठवतात गावातली त्याच्या सीनपाकी असणारी मंडळी म्हणजे सतीश ठणके, प्रकाश देवकर, छगन मिंड, कैलास राऊत, नामदेव देवकर, विलास बागल, सुभाष राऊत, बाळू देवकर, शब्बीर शेख, नबीलाल शेख यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील. यात आबा ठोंबेर, सतीश ठणके, प्रकाश देवकर, महादेव देवकर, (कै.) चरणसिंग कनिचे आणि छगन मिंड असे आम्ही आमच्या लग्नाच्याआधी उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुटीत काही काळासाठी गावाकडे एकत्र असायचो. आबाच्या घरचे आई-वडील रानात रहायला गेले होते. त्यामुळे त्याच्या घरी आम्ही जमायचो. काहीदा टेप लावायचा. सगळ्यांनी मिळून नाचायचे. गंमत असायची. आता नाचणे हे प्रतिष्ठा घालविणारे वगैरे असे काही राहिलेले नाही. उलटपक्षी अनेक चॅनेल आणि काही गोष्टींमुळे त्याला मान्यता मिळाली आहे. मी ज्या 88ते 90 च्या कालखंडाची बाब सांगतोय, त्या काळात नाचण्यापेक्षा गावात लेझीम फेमस होता. लग्नाच्या वरातीत चुकून कुणी नाचायला लागलाच तर लेझीमची पोर त्याच्यावर चिडायची. त्या काळात लग्नात आमच्यापैकी कुणीही पोर नाचत नसायची. एखादा हौशी लग्नमालक असेल तर तो नाचण्यासाठी एकाव्वन, एकशेएक किंवा एकशेएकाव्वन अशी सुपारी देऊन नाचणारा मोरवाला बोलवायचा. तो मोरवाला मोरांचा पिसारा आणि त्या पद्धतीचा पोशाख करून नाचायचा. त्यात आम्ही वरातीपुढे कधी नाचल्याचे मला आठवत नाही. लेझीमवाल्यांना त्यावेळी डिमांड असायची. त्यांचा शब्द चालायचा. त्यामुळे आम्ही आमची हौस भागविण्यासाठी, उसळणाऱ्या उर्मी शांत करण्यासाठी घराची कडी लावून टेप लावायचो आणि नाचत रहायचो. काहीदा आम्ही पार्टीही केली. त्यात मटन करणे किंवा अंडी करुन खाणे हाच भाग असायचा. आज पार्टी म्हटले की पोरांना लगेच दारु आठवणार, पण त्यावेळी आमची दारू पिण्याची बिशाद नव्हती. ती आणायची कशी, पारध्याकडे कुणी जायचे इथपासून अनेक प्रश्‍न भोडसावले असते, पण मुळातच दारू पिणे हे निषिद्ध असल्याचे आमच्या मनावर बिबलेले होते. दारू पिणे चांगले की वाईट हे ज्याचे त्याने आपापल्या अकलेनुसार ठरवावे. उगाचच फालतू सल्ले मी देणार नाही. मी नाही त्यातली अन्‌ कडी लाव आतली असलेही मला काही सुचवायचे नाही. मांडायचेय इतकेच की गावाकडची एक गोष्ट आठवली की अनेक गोष्ट आठवत राहतात. खरे तर ते आमचे वय म्हणजे प्रेमप्रकरणावर चर्चा करण्याचे वय. पण तसेही आम्ही एकमेकांची प्रेमकरण कधी एकमेकांना सांगितल्याचे आठवत नाही. त्याचेही कारण कदाचित त्यावेळच्या वातावरणात असावे. काहीदा इतरांच्या मोट्या माणसांच्या काही लफड्यांवर आम्ही चवीने चर्चा करायचो पण स्वतःविषयी ग्रुपमध्ये आम्ही कधी काही शेअर केले असे आठवत नाही. पण काहीदिवस आम्ही एकत्र होतो. लाईटली काही गोष्टींवर चर्चा व्हायची पण प्रेमाने आंधळे होऊन एखाद्याने काही गैरकृत्य केल्याचे आठवत नाही. आता आबा चांगला शेतकरी झाला. सतीशराव सरकारी खात्यात इंजिनीअर आहे. प्रकाशराव गुरुजी झालेत. बीपीएडनंतर छगनराव शेती करतोय. कैलासरावला फौजदार व्हायची पार उर्मी होती. काही का असेना तो पोलिस खात्यात आहे. विलास, सुभाष कारखान्यावर जातात. नामदेव आपल्या व्यवसायात आहे. शब्बीर गावीच असतो. नबीलालने मुंबईत जम बसविला आहे. काहीजण शेती करतात.काळ बदलतो तशा अनेक गोष्टी बदलतात. गावही आता बदलली आहे. विशेषतः नव्या माहिती क्रांतीमुळे लोकांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. एके काळी समाजमान्य लेझीम असलेला लेझीम आता गावातल्या लग्नाच्या वरातीत दिसत नाही. बॅंजो आणि त्यावर नाचणारी पोर मात्र सगळीकडे सारखीच आहेत. अनेक लग्नांत उडत्या चालीची गाणी आणि तर्र होऊन झिंगलेली पोर नाचताणा बघितली की अस्वस्थ व्हायला होते. उगाचच आमच्यावेळी असे नव्हते, असे काहीतरी वाटत राहते. असे वाटू लागले की आपण काळाच्या मागे पडलो की काय असाही विचार मनात येतो......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा