शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

तालमीतलं भांडण

  

                                पैलवानांचा आवडता देव बालब्रह्मचारी हनुमंत.
तालमीतल्या भांडणातही एक मजा असते. मी गावाबाहेर पडल्यावर फार कुणाशी भांडण केली नाहीत मात्र एकदा सदाशिवनगरकडच्या हनुमंत कोकाटेबरोबर झालेली भांडण काही माझ्या लक्षातून जात नाहीत. एका दिवशी सकाळी मी उठलो. लंगोट लावला होता. तसेच बसून राहिलो. पेटीवर बसलो होतो. तालमीत प्रत्येकाकडे पेट्या असतात. त्यात स्टोव्ह, रॉकेल, तूप, बदाम, पीठ, मीठ, तिखट, चटणी असे सगळे सामान भरलेले असते. पैसे कधीच कुणी फारसे पेटीत ठेवीत नसायचे. ते दुकानदाराकडे ठेवायचे. एक डायरी करायची. रोज त्याच्याकडून किती पैसे घेतले याची नोंद त्या डायरीत त्याच्याकडूनच करुन घ्यायची.
मी डोळे पुसत होतो. मग हनम्या म्हणाला, 'उठ की कशाला बसलाय. जा. तालमीत मेहनत कोण करणार?'
मी म्हटले, "जा तुला काय करायचे?'
तो काहीतरी बोलला. मी काहीतरी बोललो. मी अकरावीत. अगदी साठ - बासष्ट किलो वजन असेल. हनम्याची तब्बेत फार जबरदस्त होती. त्याचे वजन 85 किलोच्या घरात होते. साधारण सहाफुुटाच्या पुढे उंची होती. दिसायलाही स्मार्ट होता. मग मी त्याला चढाक काहीतरी बोललो. तो मला ढकलायला लागला. तसे हे सगळे मस्ती मस्तीत चालले होते. मीही तालमीत सेट झाल्यामुळे माझ्यात एक फुगीरीची वृत्ती आली होती. त्याशिवाय काही बॅकिंगही होते. मला राग आला आणि मी त्याला लाथ मारली. ती त्याच्या मांडीवर बसली. तो वैतागला. त्याने एकच बुक्की पोटात मारली. मला पाणीच मागायला लावले. सुरवातीला मला खरेच त्रास झाला होता. पुढे मी मकरीपणा केला. काहीवेळ तसा झोपून राहिलो. ही भांडणे पुढे रायचंद गावडेकडे गेली.
सकाळचीच घटना. मी त्यांना माझी बाजू सांगितली. त्याने हनम्याला शिव्या द्यायला सुरू केल्या. त्याला बोलावले. शिव्या देतच त्याला सांगितले, "पेटी उचलून गावापर्यंत ताणीत लावीन. समजलाच काय स्वतःला.'
हनम्या म्हटला, "नाय भाऊ, माझी काही चूक नाय.'
तो म्हणाला, "चूक असू नाय तर नसू. इथून पुढे जर असे काही केले बघ मग.' रायचंदला पोर घाबरायची. त्याचा मोठा भाऊही चांगला पैलवान म्हणून गाजला होता. ही भांडणे झाली. त्याने तालमीत आणखी वजन वाढल्यासारखे झाले.
हनम्याने ज्या प्रकारे बुक्की मारुन हुक भरली होती तशी हुक कुस्ती खेळताना अनेकदा भरल्याचे मला आठवते. मी लहान असताना बापू राउताबरोबर कुस्त्या खेळायचे. त्याने माझी अशी हूक अनेकदा भरविली. त्यावेळी केत्तुरात तालीम नवनाथ राऊत यांच्या घरामागे होती. हौद आणि वर छप्पर असे त्याचे स्वरुप होते. लाल माती आणून टाकली होती. पोरांत नाद निर्माण झाला पाहिजे, असे वाटणारी माणसं त्यावेळी होती. ती तालीम मोडखळीला आल्यावर भैरवनाथाच्या देवळाजवळ दुसरी तालीम बांधली. चांगली पक्की तालीम आहे. गावात विलास कोकणे, संभाजी खाटमोडे हे आमच्या आधीच्या वयातले पैलवान. आमचा कारभारीही कुस्त्या खेळायचा पण मी त्यावेळी खूपच लहान होतो. त्याचे लग्न झाले तेव्हा मी पहिली दुसरीत असेल. त्यामुळे त्याने केलेल्या कुस्त्या मला फार आठवत नाहीत. पुढे आमच्याआधी आमचाच बाळू महाराज म्हणजे माझा मोठा भाऊ, दत्तू कानतोडे यांची एक कुस्तीची थळी होती. पण गावात उसाचे पिक आले. उजनीच्या पाण्यामुळे शेती बागायती झाली. लोकांच्यात आर्थिक ताकद आली. त्यामुळे मग कोल्हापूरला अनेकांनी आपली पोर पाठविली. तसा हा एक नाद असतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा