सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

परिस्थितीच करते जडणघडण

परिस्थितीच करते जडणघडण
दोन दिवस गावी जाऊन आलो. त्यामुळे थोडे लेखन थांबले आता पुन्हा सुरू करतो. माझ्या वर्गात गावातले रामदास देवकर, भरत देवकर, बाळू भरणे, नामदेव उर्फ दादा येडे, गणपत भरणे, संभाजी ठणके, पोपट राऊत, नवनाथ ठोंबरे यांच्याबरोबरच मीरा खाटमोडे, सविता कोकणे, कमल राऊत या मुली होत्या. कदाचित यापेक्षा जास्त जण असतील आता मला इतकेचजण आठवतात. यातल्या कमल आणि मीराचे लग्न तशी लवकरच झाली. मला कौतुक वाटते ते सविताचे. तिचे आजोबा (कै.) तुकाराम बापू रेल्वे नोकरीला होते. त्यांनी सविताला शिकविले. तीही शिकली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. त्यानंतर लग्न केले. एका छोट्या गावात, जिथे मुलींची लग्न झटापट उरकली जातात, तिथे सविताने थांबावे, तिला घरच्यांनी साथ द्यावी, हे तसे खूप वेगळेपण आहे. मला तिचा कायम आदर वाटत आला. आम्ही दहावीनंतर किंवा त्याआधीसुद्धा फार कधी बोलल्याचे मला आठवते नाही. पण बापू खूप गप्पा मारायचे. जग बघण्याची थोडीशी दृष्टी बदलली तर जगणे स्वतःच्या कष्टाने, बुद्धीने सुकर होऊ शकतो, याचे मला सविता हे उदाहरण वाटते.
आपल्याकडे महिलांचे मोठ्या प्रमाणावर शोषण का होते, त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना का तोंड द्यावे लागते, त्याचे कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसतात. सविता स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि नंतर लग्न केले. हे तिने ज्या काळाच आणि ज्या शेतकरी समाजात करून दाखविले, ते कौतुकास्पद आहे. गणपत आणि बाळू भरणे दोघे मोठे बागायतदार आहेत. दादा येडे माझा पाचवी सहावीत फार जीवाचा मित्र होता. त्याचा डबा मला फार आवडायचा. तो त्याच्या रानात असलेल्या झाडांचे पेरूही आणायचा. आता तो आमचा जवळचा पाहुणा झाला. त्याने त्याच्या माझ्या जुन्या संबंधांना काही प्रश्‍न उभे राहूनही कधी बाधा आली नाही. तो मला लहानपणापासूनच आवडतो. तसा रामा देवरकही मला खूप आवडतो. ठणकेच्या संभाजीनेही खूप चांगली उन्नती साधली आहे. मला नेहमी वाटते, माणसं पुढे जातात त्याला कारण त्यांच्याभोवताली परिस्थीती, त्यांना मिळालेली संधी याच गोष्टी कारणीभूत असतात. पुढे जातात म्हणजे त्यांच्या अनुभवाचा परिघ मोठा होतो इतकेच. दादा आणि रामासुद्धा पुढे गेले असते पण परिस्थिती माणसाला जखडून टाकते.
हे आबाच्या बरोबरीने त्याच्यामागे दडलेले माझे बालपणीचे वर्गमित्र. हायस्कूलच्या माझ्या वर्गात मी राहतो, त्या केत्तूर एकशिवाय पारेवाडी, हिंगणी, पोमलवाडी, वाशिंबे, याइतर गावातले अनेकजण होते. त्यातलेही लक्ष्मण दडस, कल्याण साळुंखे, टाकसर, बाबर, जाधव, गुलमर, माळशिकारे यांच्याबरोबर शहाजी पाटील, संजय आवटे अशी अनेक नावे आठवत राहतात. काळाच्या ओघात आम्ही इकडे तिकडे भरकटलो. आता यातल्या कुणी बोलावले तरी गावाकडे गेल्यावर त्यांच्या घरी जायला जमेलच असे नाही. माझ्या आयुष्यात मी काही धक्के खाल्ल्यानंतर मला गावी तर जावेसे वाटते. मी नेहमीच जातो पण घराच्या बाहेर कधी फारसे पडत नाही. कारण घरातच इतकी माणसं, लहान पोर आहेत आहेत, की त्या सगळ्यांशीच बोलून होत नाही. तोपर्यंत माघारी मला जायला निघावे लागते. त्यामुळे यातले काहीजण कधी भेटतात तर काहीजणांच्या भेटी होत नाहीत. आबा ठोंबरेने खरेच तसे स्वतःच्या हिमतीवर स्वतःला खूप बदलले. ते मला खूप भावते. त्याच्या बदलण्यात तो स्वतःची आर्थिक उन्नती करत राहिलाच पण त्याचे सामाजिक भान सुटलेले नाही, हे मला पुन्हा पुन्हा सांगितले पाहिजे. आपण काहीतरी करायला हवे, असे त्याला नेहमी वाटते. त्या उर्मीनेच तो सतत काहीतरी करत असतो. त्याचा माझा सतत संपर्क असतो. मला गावाची आठवण झाली की मी त्याला फोन करतो. ख्यालीखुशाली विचारतो. तोही काहीतरी सांगतो. एक चांगली वेव्हलेंथ जुळणे ज्याला म्हणता येईल तसे आमच्यादोघांत सतत टिकून आहे, त्यामुळेच चांगल्या गोष्टी, यशकथा शोधायच्या तर लांब कशाला जायला हवे, आपल्या आसपासच त्या सापडतात, या भावनेतून मी हा लेख लिहिला होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा