गेल्या 25 वर्षांपूर्वी विद्यार्थिदशेत वक्तृत्व हा प्रांत गाजविणारे, राज्यभरातील अनेक स्पर्धांत बक्षिसे मिळवणारे वक्ते आता काय करतात? वक्तृत्व स्पर्धांविषयी त्यांना काय वाटते? काही जणांशी साधलेला हा संवाद...
---------------
आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, असे कॉलेजात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी स्वतःला व्यक्त करण्याचे मार्ग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, अनुभवानुसार निवडत असतो. कुणाला एनसीसी जवळची वाटते, कुणी कविता करतो. नाटक, गाण्यात कुणाचा जीव रमतो. कुणी खेळात प्रावीण्य मिळवून गाजत असतो, तर कुणी आपल्या वक्तृत्वाने अनेकांना पागल करून सोडतात. अभ्यासाव्यतिरिक्तच्या या गोष्टी आयुष्य घडवायला मदत करतात, असे नेहमीच सांगितले जाते; पण खरी फॅक्ट काय आहे? गेल्या 25 वर्षांपूर्वी विद्यार्थिदशेत वक्तृत्व हा प्रांत गाजविणारे, राज्यभरातील अनेक स्पर्धांत बक्षिसे मिळवणारे वक्ते आता काय करतात? वक्तृत्व स्पर्धांविषयी त्यांना काय वाटते? काही जणांशी साधलेला हा संवाद...
महिलांसाठी अक्षरयात्री संमेलन
------------------------------
महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांत चमकणाऱ्या बहुतांश मुली लग्न झाले, की वक्त्या म्हणून संपल्या, असे सर्वसाधारण चित्र दिसते. करिअरच्या अंगाने आपली धडपड चालू ठेवणाऱ्यांत स्वाती शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. सांगली जिल्ह्यातील विटा येथे त्या महिलांसाठी अक्षरयात्री संमेलन भरवितात. त्यांचा "स्त्रीकोश' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या म्हणाल्या, ""वक्तृत्व स्पर्धा गाजविणारी मुले वक्ते म्हणून पुढे आलीत, असे दिसत नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु तरुण पिढीतील अनेक लेखक, कवी, पत्रकार आणि वकील हे विद्यार्थी जीवनात चांगले वक्ते होते, हे लक्षात घेतले पाहिजे. स्पर्धांमध्ये आलेले व्यावसायीकरण आणि केवळ बक्षिसांवर ठेवली जाणारी नजर, यामुळे अनेक जण विरून जातात. तरीही दैनंदिन जीवनातील संघर्ष सोडविण्यासाठीचे बळ या स्पर्धा देतात.''
समाजाला दिशा देण्यासाठी ...
----------------------------
"समाजाला दिशा देण्यासाठी कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड देणे गरजेचे आहे,' असे सांगणारे अभिजित नामदे सध्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली करीत आहेत. परभणी म्हटले, की वक्तृत्व स्पर्धेला जाणाऱ्या मुलांना अभिजित नामदे हे नाव आठवायचेच. स्पर्धक म्हणून महाविद्यालयीन जीवनात राज्यभर बक्षीस जिंकत फिरल्यामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले आहेत. स्पर्धांच्या गमतीजमतींविषयी त्यांच्याशी गप्पा मारणे, हा आनंदाचा भाग असतो. ते म्हणाले, ""चांगला वक्ता राजकारणातच असला पाहिजे, असा गैरसमज काही जण करून घेतात. आपण चांगले बोलायला लागलो की नेता होऊ, असे काही जणांना वाटते; परंतु राजकारणात त्याच्याशिवाय अनेक गोष्टी कराव्या लागतात, हे लक्षात घेतले तर "डिप्रेशन' येणार नाही. मला स्पर्धांमुळे वाचनाची सवय लागली. त्याचा फायदा आता वकिली करताना होत आहे.''
---------------------------
विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा
--------------------------
प्राथमिक शिक्षक असलेले सुरेश पवार मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा भरवितात. ते म्हणाले, ""या स्पर्धांत काही ठराविक तिघा-चौघांची बक्षिसे मिळविण्याची मक्तेदारी तयार होते. महाविद्यालय फक्त एका बाजूचा प्रवासखर्च देते. मग अनेक जण स्पर्धेपर्यंत पोचू शकत नाही आणि त्यामुळेही अनेक जण वक्तृत्वापासून दूर जातात; परंतु या स्पर्धांचा आणि वक्तृत्वाचा आयुष्यभरासाठी फायदा होतो.'' कोल्हापूर जिल्ह्यातील घाळी वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त विषयावर प्रथम क्रमांक मिळाल्याची आठवण सांगताना त्यांच्या आवाजातला फरक लपून राहत नाही. सोलापुरात डी.एड.ला असताना त्यांनी काडादी वक्तृत्व स्पर्धेत डोक्यावर गांधी टोपी असलेल्या गणवेशात भाग घेतला होता. "हा बावळा मुलगा नेमके काय बोलणार,' हा भाव परीक्षक आणि स्पर्धकांच्या चेहऱ्यावर होता; परंतु ते भाषण संपवून खाली उतरत असताना आख्खे सभागृह टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या भाषणाला दाद देण्यासाठी उभे होते.
डॉक्टर लेखक
आपण काय बोलतो आणि काय वागतो, याचा ताळमेळ अनेकांना बसत नाही; परंतु मी बोललो तेच वागणार, ही ऊर्मी सांभाळणारे काही जण भेटतात. त्यांतले एक म्हणजे डॉ. प्रदीपकुमार आवटे. सोलापुरातून एम.बी.बी.एस. झाल्यावर बालरुग्णतज्ज्ञ होऊनही जाणीवपूर्वक ठरवून त्यांनी करमाळा तालुक्यातील कोर्टीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा केली. कविता करणे, एकांकिका लिहिणे आणि वक्तृत्व स्पर्धांत भाग घेणे, हे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आवडते उद्योग होते. ते मुलांसाठी निघणाऱ्या "पाखरांची शाळा' नावाच्या मासिकाचे काही दिवस मानद संपादक आहेत. ""सभोवताली घडणाऱ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींशी आपले काही नाते आहे, ही जाणीव वक्तृत्व स्पर्धांमुळे येते. लोकांसमोर बोलल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. कॉलेजमध्ये मुलांचा ग्रुप मिळतो. आपण कुणीतरी आहोत, हे आत्मभान या स्पर्धा देतात. तरीही स्पर्धा गाजविणारी मुले पुढे वक्ते म्हणून उमटत नाहीत. हा आपल्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे. मूलभूत विचार करण्याऐवजी तात्पुरत्या अभिव्यक्तीकडे मुले लक्ष देतात, असे अनेकदा जाणवते,'' असे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना लेखक म्हणूनही त्यांनी ओळख मिळविली आहे.
"डोक्यात हवा जाणे घातक'
बिकट आर्थिक स्थितीमुळे सोलापुरातील शिवाजी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावे लागलेल्या किसन तुकाराम दाडगे यांनी सांगितले, की एमएसडब्ल्यूला असताना वक्तृत्वामुळेच 1999 मध्ये बंगळूरला राष्ट्रीय एकात्मता शिबिरात टीमलीडर होण्याची संधी मिळाली. देशभरातील वेगवेगळ्या मुलांशी त्यामुळे मैत्रीचे नाते जोडता आले; परंतु कॉलेजमध्ये गाजत असताना प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्यामुळे लयाला गेलेले काही जण आता दिसतात. मी म्हणतो तेच झाले पाहिजे, ही वृत्ती तयार होते. त्यातून प्राध्यापकांशी उर्मटपणे बोलतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि करिअरचा ऱ्हास सुरू होतो. ही गोष्ट सांभाळली तर या स्पर्धा बरेच काही देऊन जातात, असे त्यांनी नमूद केले.
या प्रातिनिधिक नावांशिवाय चंद्रकांत पाटील, श्रीकांत माळखांबे, महेश खरात, विष्णू मस्के, दत्ता थोरे, औदुंबर चव्हाण, फारुख नायकवाडी असे अनेक जण सध्या वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्यरत आहेत. स्पर्धांनी वक्ते निर्माण केले नसले तरी अनेकांना बिकट परिस्थितीतून उभे राहण्यासाठी हात दिला आहे. नुसती तात्पुरती पोपटपंची करणारे, कुणाकडून तरी भाषण लिहून घेणारे संपतात. ज्यांना वाचनाची आवड निर्माण झाली, नवे समजूत घेण्याची ऊर्मी जागृत झाली ते "शब्दप्रभू' आजही केवळ शब्दांची पूजा न करता जिथे अंधार आहे, तिथे लोकांसाठी प्रकाश वाटत फिरण्याचे काम करीत आहेत, असे दिसते.
(हा लेख 2005 मध्ये युवा सकाळमध्ये प्रसिद्ध झाला होता)
शुक्रवार, १ जानेवारी, २०१६
शब्दप्रभू ः 25 वर्षांपूर्वीचे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा