सोमवार, १८ जानेवारी, २०१६

चिमूटभर गावाची मूठभर ऊर्जा

करमाळा तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त केत्तूरमध्ये लोकवर्गणी आणि ग्रामस्थांचे श्रमदान यातून रस्ता आणि पुलाचे काम झाले. दीडशे पावणेदोनशेचा उंबरा असलेल्या चिमुटभर गावाने उभारलेले हे काम अनेकांना थक्क करते. तरुण मुलांत, शेतकऱ्यांत ही ऊर्जा कुठून आली? त्यांनी पैसे कसे जमविले? या सगळ्याची नेमकी पार्श्‍वभूमी काय?
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात प्रकल्पग्रस्त केत्तूर एक ते दोनला जोडणाऱ्या पुलाचे लोकवर्गणीतून झालेले काम ही तशी एक छोटी तरीही क्रांतिकारक घटना आहे. शेती करणाऱ्या तरुण पोरांनी, शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून, श्रमदानातून विकासकामे या संकल्पनेचा केलेला हा एक छोटासा प्रयोग आहे. व्यवस्थेने कायम ज्यांची लुबाडणूक केली त्या शेतकऱ्यांच्या आणि गावात राहणाऱ्या तरुण पोरांच्या हातात काही रक्कम आली तर ते किती उदार होऊन आपल्या सोईसाठी खर्च शकतात, याचे हे उदाहरण आहे. दीड-दोनशे उंबरा असणाऱ्या चिमूटभर गावाने निर्माण केलेली ही मूठभर ऊर्जा व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना विधायक बळ देणारी आहे. शहरी, स्वकेंद्रीत सरकारच्या नावाने कायम खडे फोडणाऱ्यांना मार्ग दाखविणारी आहे. सरकार नावाच्या डोळे झाकून बसलेल्या यंत्रणेला जागे करणारी आहे. आपण लोकांना कायम भुलवू शकत नाही. गाव छोटे असले तरी आपली लक्तरे वेशीवर टांगू शकते, असा संदेश पुढाऱ्यांना देणारी ही घटना आहे. अशी कामे जिथे होतात तिथे एक गोष्ट दिसते, ती अशी की त्याठिकाणचे नेतृत्व नेतेगिरी करणारे नसते. लोकांच्या आशाआकांक्षांना विधायक वळण देताना त्यांना विश्‍वास वाटेल अशा म्होरक्‍यांची गरज असते. तसा जो कुणी म्होरक्‍या असतो तो म्हणजे आपणच आहोत, इतका विश्‍वास निर्माण झाला की लोक त्याच्या खांद्यावर मान टाकायला तयार होतात. या कामातही तेच झाले, जे पाच सहाजण पहिल्यापासून या कामासाठी धडपडत होते, त्यांनीच पुढेही पुढाकार घेऊन हे काम तडीला नेले. काम किती चांगले झाले? किती दिवस टिकेल? नियोजनाने प्लॅनइस्टीमेट तयार केले होते का? अशा प्रश्‍नांना उत्तर देण्याची गरज नाही. कारण हे या कामात गावकऱ्यांचा जीव एकवटला होतो. जिथे जीव ऐकवटतो, ते काम चांगले होतेच. जिथे जीव एकवटतो तिथे नवनिर्माणाची प्रक्रिया घडते. साधी जेवणासाठी भाजी करायची म्हटले तर ती जर मनापासून केलेली असेल तर तिला फार मसाला नसला अगदी चटणी, मीठ टाकूनच केली तर तिला भुकेल्यापोटासाठी चव येते. तसे या कामाचे आहे. हे गाव या कामासाठी साधारण 30-35 वर्ष धडपडत होते. आख्खे गाव या कामासाठी एक झाले होते. त्यामुळे त्याला निर्माण झालेली नवनिर्मीती ही अनेकांना थक्क करायला लावणारी आहे. त्यामुळे नुसतीच मुद्रीत माध्यमे नव्हे तर विविध मराठी, हिंदी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या कामाची दखल घेतली. देशभर हा विषय गेला. (अपूर्ण) 

३ टिप्पण्या: