केत्तूरच्या पुलासाठी इतके पैसे कसे जमविले? असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरे तर आज जमाना घ्यायचा आहे. द्यायला तयार असणाऱ्यांचे प्रमाण कमीच दिसते. पण गावात देणाऱ्यांची कमतरता नाही, हे यावेळी दिसून आले. त्यात "उजनी धरणाने गावाला काही दुःख जरूर दिली. अनेक मूलभुत सुविधा अजून प्रकल्पग्रस्त भागात नाहीत पण तरीही एक गोष्ट मात्र नक्की दिली. पाणी. त्याच्या जिवावर या भागात सगळा ऊस पिकतो. शेतकरी कर्जात असले तरी त्यांच्या हातात पैसा खेळतो आहे. या आर्थिक ताकदीच्या बळावर हे काम झाले. जिराईत भागात असे काम करायचे म्हटले तरी ते ज्यांच्या हातात पैसाच नाही, त्यांना जमणार कसे? दुसरी गोष्ट दानतही लागते. एखाद्या कुठल्याही सार्वजनिक उत्सवाला गावात हाक दिली तर लाखदोन लाख सहज गोळा होतात. त्यामुळे एक बैठक घेतली आणि ठरविले प्रत्येकाने वर्गणी द्यायची. ज्यांना ऊस जात नाही, त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे जितका वाटा उचलता येईल तितका उचलायचा. गावातल्या लोकांत स्वाभिमान जागा झाला. शेजारपाजारच्या गावांनीही मदत केली. केत्तूरची दोन्ही गावातील गावकरी मदतीला धावले. गोयेगावकरांना वाटले, त्यांनी काही मदत दिली. पारेवाडीसह परिसरातील अन्य गावातील काही माणस मदत केली. दात्यांची कमतरता या भूमीत कधीच नव्हती आणि नाहीसुद्धा, फक्त विश्वाहार्य माणस लागतात. या कामासाठी सगळेच पुढे आले. त्यांच्यातल्या चांगुलपणाविषयी लोकांना विश्वास वाटला म्हणून काम झाले आहे. पन्नास हजार देऊ शकतील अशीच एक यादी झाली. मग कामाला सुरवात झाली.
जागा झाला स्वाभिमान
गावाच्या मनात कोणत्याही नेत्याविषयी अथवा पुढाऱ्याविषयी कटुतेची भावना नाही. आश्वासने देणे पुढाऱ्यांचे काम आहे, असे ते मानतात. त्यामुळे त्यांनी काम सुरू केले. गावकऱ्यांची मदत मिळत गेली. बघता बघता काम उरकत आले. सुरवातीला अगदी बातम्या येण्याअगोदर हे काम नेमके काय हे बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील दोन चारशे लोक रोजच काम बघायला यायचे. लोकांत जागा झालेला स्वाभिमान पाहून लोकांना खूप बरे वाटायचे. आपणही काहीतरी करू शकू, अशी भावना लोकांत जागी व्हायची. हे काहीतरी वेगळे आहे. लोकांना व्यक्त होण्याचे हे माध्यम आहे, असे लोकाना वाटायचे. मग जेव्हा पुन्हा वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या येऊ लागल्या. पुन्हा दूरचित्रवाणी वाहिन्यांचे लोक यायला लागले. कामाची प्रसिद्धी सर्वदूर होत गेली. लोकांना बरे वाटायला लागले.
यांनी घेतला पुढाकार
या पुलाच्या बापूसाहेब पाटील यांच्याबरोबरच बंडू पाटील, माधवराव खाटमोडे, शंकर कानतोडे, डिगांबर नाझरकर, आबा ठोंबरे, रामा कोकणे, लालासाहेब कोकणे, हनुमंत राऊत, नवनाथ राऊत, भीमराव येडे यांच्याबरोबरच केत्तूर दोनमध्ये राहणारे माजी सरपंच अशोक पाटील, उदयसिंह मोरे पाटील, दादासाहेब निकम, पंडित माने, राजाराम माने, अजित विघ्ने यांच्यासह गावातल्या प्रत्येकाचाच पुढाकार घेतला. इथे नाव राहिल तरी मुळात नावासाठी कुणी कामच करत नव्हते. यातल्या अनेकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून अगदी मुंबई, दिल्लीपर्यंत भेटीगाठी घेतल्या. मग स्वतःच कामाला सुरवात केली. ते पूर्णत्वास नेले. रामराव पाटील यांनी मागदर्शकाची भूमिका निभावली. आमच्या काळात काही होऊ शकले नाही आता तुम्ही करत रहा, असा त्यांचा सल्ला असायचा, असे गावातील तरुण मंडळी सांगतात.
या कामाबाबत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पाटील म्हणतात, ""राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा उडत चाललेला विश्वास ही चिंतेची बाब आहे. पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या सगळ्याच पक्षातल्या लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आम्ही केलेले काम हा एक प्रयोग आहे. त्याची लोकचळवळ होणे ही आजची, काळाची गरज आहे. सरकार तुमच्या सगळ्याच गोष्टीला पुरे पडू शकत नाही. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आपली कामे मार्गी लावणे हा संदेश यातून सर्वदूर जायला हवा.'' (क्रमशः)
बुधवार, २० जानेवारी, २०१६
दात्यांची कमतरता नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा