राजाराम कॉलेजचे सवंगडी...
चांगले असणारे अनेकजण राजाराम कॉलेजच्या
होस्टेलमध्ये मला सिनिअर म्हणून भेटले. कुंभारगाव (ता. करमाळा)चे राजकुमार लोटके,
कोळेगाव (माळशिरस)चे धनंजय दुपडे, पवारवाडी (ता. फलटण)चे संजय पवार, भाऊसाहेब
चव्हाण, आसूचे अनिल पवार, एम. टी. कोथळी अशी कितीतरी नावे घेता येतील. एमटी
कोथळीकडे गाडी असायची. मला त्याच्या मागे बसायला मिळायचे हेच फार भारी वाटायचे.
माझा मोठा भाऊ माझ्याकडे एकदा आला. त्यावेळी गोकुळ प्रकल्प बघायला शिरगावला आम्ही
तिघे त्याच्या गाडीवर गेलो होतो. दादा कोंडकेचा पिक्चर बघितला होता. वर्गात आमचा
सहा-सातजणांचा ग्रुप फार घट्ट होता. त्यात शांतराज मारुडा, जे. जे. शिंदे. विजय
मोहिते, शरद मुळीक, प्रशांत शेंडे आणि मी असे आम्ही रोजच एकमेकांना भेटायचो. त्यात
शांतराजसह सगळ्यांचा अजून संपर्क आहे मात्र एकमेकांना वेळ देणे होत नाही. सगळ्यांनी
आयुष्यात अनेक धक्के पचविले. त्यावेळी आम्ही तसे एकमेकांच्या मदतीला जाऊ शकलो नाही.
सुरवातीला प्रशांत शेंडेची दोनतीन वर्ष दिवाळी शुभेच्छांची पत्रे आली. पण परत
जसेच्या तसे सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. शांतराज मला जबरदस्त वाटायचा.
गॅदरिंगच्यावेळी त्याने माझ्याशी एक पैज लावली. कार्यक्रम सुरू होणार होते, तो
म्हणाला, "टेबलवर जो तांब्या ठेवला आहे, त्याच्यातले पाणी पिऊन यायचे. मी सगळ्यांना
नास्ता देणार. सभागृह तुंबाड भरले होते. मी थेट व्यासपीठावर गेलो. पाणी पिण्याचे
माझे धाडस झाले नाही मात्र तिथे उभ्या असलेल्या सरांना म्हणालो, "सर पाणी प्यायचे.'
ते म्हणाले, "जा की बाहेर. इथे कुठे आहे पाणी?'' मी आलो उतरून खाली. त्याने नाश्ता
नाही मात्र चहा दिला. शांतराजने मला एक शर्टचे कापड दिले होते. इतके भारी होते ते
की त्याचा पांढरा रंग शर्ट जसाजसा धुतला जाईल तसातसा आणखी शुभ्र होत जाई. आता तो
माझ्यावर नेहमी वैतागतो. एकदा तर "का रे, लय शहाणा झालास का?' म्हणून मला दमही
टाकला. पण खरेच मला कामाच्या या सगळ्या धबडग्यातून वेळच होत नाही. काय करणार?
माझा होस्टेवरचा रुमपार्टनर मनोहर चव्हाणविषयी माझे मन अजूनही भरून येते.
माणसाने सज्जन असावे, पण इतके? परिस्थीती थोडी बेताचीच होती पण कधी बाबा कुणापुढे
कशालाच हात पसरत नव्हता. बहिणीकडे जाऊन जेवण करायचा. तिला काही व्यवसायात मदत
करायचा. त्यातून आपल्या सगळ्या फिया भागवायचा. बारावी संपल्यावर माझी जुनी घेतलेली
सायकल मी त्याला शंभर दीडशेला विकली. सहाजिकच त्याच्याकडे मला द्यायला पैसे नव्हते
मग त्याने ते पैसे मनिऑर्डर करून पाठविले. मला ते पुण्यातल्या गरवारे कॉलेज
होस्टेलमध्ये उपयोगाला आले. त्याची आर्थिक स्थिती नव्हती पण त्याला सलाम करावा, असा
प्रामाणिकपणा त्याच्याकडे होता.
या होस्टेवर हिंदीतला आर. माधवन हा सध्याचा
आघाडीचा नटसुद्धा त्याच दरम्यानच होता. तोही विश्वास नांगरे पाटील यांच्या बॅचचा
होता. इंग्लिश स्पोकनचा क्लास घेण्याचा प्रयोग त्याने होस्टेलवर एकदा केला. मी एक
दिवस त्याचा विद्यार्थी होतो. एकदा मी तोंड धुतले आणि लुंगी गुंडाळून थेट तो क्लास
घ्यायचा त्या रीडिंग रुमध्ये जाऊन बसलो. त्याने मला उठवले. पॅंट घालूनच क्लासमध्ये
यायचे, असे सांगितले. त्यानंतर मी काही क्लासला गेलो नाही आणि त्यानेही काही
दिवसांनी तो गुंडाळला. तो एनसीसीत होता. त्याने आरडी परेड केली. त्यामुळे त्याची
एकूण बॉडीलेग्वेज आजही एकदम सावधान अशी दिसते.
या लेखाविषयी अनेक प्रतिक्रिया
आल्याच. त्या कुणी दिल्या, काय दिल्या, ही मोठी जंत्री होईल. त्यातल्या दोन सांगतो.
एक म्हणजे त्याच वेळी एका रविवारी संजय आवटे याने फोन करुन मैत्र दिनाच्या शुभेच्छा
दिल्या. मी म्हणालो, आज मैत्र दिन आहे काय? तो म्हणाला तुम्ही लेख लिहिणार आणि
मैत्र दिन आम्हाला विचारणार. मला खरेच त्यावेळी मैत्र दिन त्याच दरम्यान असल्याचे
कळले. लेख लिहिताना हा संदर्भ माझ्या डोक्यात अजिबातच नव्हता. आवटे माझे आणि मी
त्याचे कायम चांगले चिंतणारा जवळचा मित्र आहे. तरीही आमच्यात एक अंतर आहे. पाचवी ते
दहावी आम्ही एका वर्गात होतो. पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. पुणे विद्यापीठात पुन्हा
आम्ही होस्टेवर एकाच वेळी एक वर्षभर होतो. विद्यापीठात आम्ही तशा अनेक रात्री गप्पा
मारत जागवत काढल्या. आम्ही गप्पा मारायचो, रात्रीचे दोन, तीन, चार, पाच वाजायचे.
रुम पार्टनरच्या झोपेचे खोबरे झालेले असायचे. तो वैतागयचा. आमच्या गप्पांचा विषय
कायम राजकारण, समाजकारण हाच असायचा. आपल्याला काय करता येईल, याचे आराखडे आम्ही
बांधत रहायचो. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. पण त्याने पत्रकारितेत जी धडक मारली
तिचा मला कायम अभिमान वाटत आला आहे. मी पत्रकारितेचा कोर्स त्याच्याआधी एक वर्ष
केला मात्र तो "सकाळ'मध्ये माझ्याआधी साधारण सहा महिने लागला. कायम
होण्याच्यादिवशीच त्याने सकाळ सोडला. सोलापूरला संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू
झाला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 23-24 असेल. इतक्या कमी वयात त्याने
सोलापूरलासुद्धा ज्या पद्धतीने काम केले, एक त्याचा चाहता वर्ग इथे तयार झाला आहे.
खरे तर पत्रकारितेत वरच्या पदावर काम करणे म्हणजे तसे अवघड असते कारण इथे सगळेच
हुशार असतात. तुम्हाला तुम्ही कायम त्यांच्या चार पावले पुढे आहे, हे दाखवता आले
नाही तर गडबड होते. सोलापूर, अकोला, पुणे, नवी मुंबई, आता अलिबाग, पुणे आणि मुंबई
असे प्रत्येक ठिकाणी त्याने संपादक, वृत्तसंपादक अशा प्रमुख पदांवरच काम केले. आता
साम वाहिनीवर आवाज महाराष्ट्राचा गाजवतोय. कार्यक्रम सगळीकडे मालकांनी,
व्यवस्थापनाने संपादकांना, संपादकीय विभागातील वरिष्ठांना काढून टाकण्याच्या
दिवसांच्या कालखंडात त्यांना घुमवणारा, तुमच्याशी जमत नाही, मीच आता सोडतो, असे
म्हणणारा एखाद्या तरुण पोरगा असावा, याला तोडच नाही. काही पुस्तकेही त्याच्या नावार
आहेत. पण त्याची एक गोष्ट मला कायम भुरळ घालत आली आहे त्याला जे म्हणायचे आहे
त्याच्याशी तो कधीच तडजोड करीत नाहीत. तो हुशार आहे का तर मी म्हणेन हुशार अनेकजण
असतात, पण स्वतःला प्रेझेंट करण्याचे, स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचे आणि हे सगळे
कटूता न येऊ देता, समोरच्याला न दुखवता करण्याचे त्याचे स्कील वादातीत आहे.
त्यामुळे त्याने लेखावर दिलेली प्रतिक्रीया मला महत्वाचीच वाटते.
दुसरी
प्रतिक्रिया अगदी नुकतीच मिळाली. ती ऐकल्यामुळेच आपण हा लेखामागचा लेख लिहला
पाहिजे, असे मला वाटले. केंद्र सरकारकडे प्रादेशिक माहिती अधिकारी अंकुश
चव्हाणबरोबर मी सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त पी. आर. पाटील यांच्याकडे गेलो होतो.
त्यांची आणि अंकुशची कोल्हापूरची ओळख होती. अंकुशने माझी त्यांच्याशी ओळख करून
दिली. ते घडीभर थांबले. मी तुम्हाला ओळखतो. मला कळेना आमची ओळख कुठे झाली. मी
कोल्हापुरात होतो. पण माझी त्यांच्याशी कधी थेट ओळख झाल्याचे मला आठवत नव्हते. ते
म्हणाले, "तुमचा युवा सकाळचा लेख माझ्या अजून लक्षात आहे. तुम्ही त्या तीन
मित्रांची नावे का लिहिली नव्हती हो.' मला घडीभर काय बोलावे हे कळेना. मी काहीतरी
म्हणून वेळ मारुन नेली आणि पुढे आपण या तिघांबरोबच कोल्हापुरात संपर्कात आलेल्या
काही मित्रांविषयी लिहायचे, असा मी ठरविले.
(अपूर्ण)