मी साधारण 1999 मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर वृत्तमालिका लिहिली. ती सोलापूर सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी मी पुण्यात होतो. विजय साळुंखे सर त्यावेळी सोलापूर आवृत्तीचे पुण्यातून काम पहात होते. या मालिकेत प्रामुख्याने मी दळवळणासाठी रस्त्यांचा अभाव, इतकी वर्ष झाली तरी प्लॉट न मिळणे, रखडलेले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अशी तीन भागांची हि मालिका होती. त्या काळात होडी बुडाल्याची घटना कळाली की अंगावर थरकाप उडायचा. अशा काही घटना या भागात झाल्या पण या गावात अशी दुर्घटना कधी घडली नाही. होडी एकदा बुडाली, पण वेगळ्या ठिकाणी. पैलवान पोर होडी घेऊन आगोतीला गेली होती. तिथे फड होता. या होडीत पाणी येत होते. तिकडून यायला अंधार झाला. बुडालेली होडी गांजीवळण येथे सापडली. तशी होडी बुडाली तरी तिचा घोडा वरच राहतो. होडी कधी तळाला जात नाही. तिच्यात जर काही वजन असेल तर मात्र ती वर रहात नाही. पाणी आले की बुडायला लागते. त्यानंतर 2001 मध्ये मी सोलापुरात आल्यावर अनेकदा हे विषय येत गेले. सकाळमध्ये साधारण 2008 च्या दरम्यान लोक लोकवर्गणीतून काम करणार असेही छापून आले होते. बातम्या येत गेल्या. पुण्यात असताना दोनदा मी रात्री एकटाच होडी घेऊन केत्तूर दोनवरुन केत्तूर एकला आलो होतो. एकदा नदीच्या काठालाच रात्रभर बसलो होतो. आता जशी मोटारींची गर्दी आणि सतत नदीच्या काठाने लोकांचा वावर असतो, तितका त्या काळात नसायचा. त्यामुळे एकट्यादुखट्याने जाणे म्हणजे अंगावर काटा यायचा. तसे पारेवाडी रेल्वे स्टेशन हे चोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण केत्तूर एकच्या लोकांना फार कधी अशा चोऱ्यांचा खूप त्रास झालेला मला आठवत नाही.
केत्तूरच्या गावकऱ्यांनी केलेल्या या कामानंतर पुढच्या उन्हाळ्यात म्हणजे 2013 मध्ये केत्तूर पोमलवाडी जोडणाऱ्या रस्त्याचे काम केत्तूर दोन आणि पोमलवाडी ग्रामस्थांनी सुरू केले. त्याला विरोध हिंगणी ग्रामस्थांनी केला. त्याला पारेवाडी ग्रामस्थांचा पाठिंबा होता. विरोधाचे कारण असे होते की आमचे पाणी तुम्ही अडवत आहात. त्याला मग पुढे राजकारणाचे स्वरुप आले. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. याबाबत पाहणी करुन पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल द्यावा, असा आदेश न्यायालयाने केला. त्याची मग एक अशी आवई उटली की काम बंद करायला सांगितले आहे. त्यावेळी मी अशोक पाटील, सूर्यकांत पाटील, अजित विघ्ने या मंडळींशी बोलून प्रतिक्रियांची एक बातमी दिली. आम्ही एक छोटा पूल बांधत आहोत, कुणाचे पाणी अडवत नाही. न्यायालयाची याचिकार्त्यांनी दिशाभूल केल्याची चर्चा असा बातमीचा पोटमथळा होता. त्यानंतर मग दोन सुनावण्या न्यायालयापुढे झाल्या. याचिका डिसमीस झाली. ही बातमी मला आवडण्याचे कारण आपण एखादी बाजू घेऊन काही लिहिणे हा भाग जरी त्यात असला तरी लोक आपल्या दळणवळणाच्या सुविधेसाठी काहीतरी बघत असताना त्याला खोडा घालून ते सगळे तसेच पडू देणे हे काही बरोबर नाही, असे माझे मत होते.
याचिका निकालात निघाल्यानंतर पोमलवाडीकर नेटाने कामाला लागले. त्यांनी तर खूपच मोठे काम केले आहे. आता या दोन्ही ठिकाणची गरज अशी आहे की पक्का डांबरी रस्ता होऊन ही गाव भिगवणशी जोडली जाणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, राज्य सरकार हे काम करणे गरजेचे आहे. एका पिढी समस्याग्रस्त जगत गेली आता प्रकल्पग्रस्तांच्या दुसऱ्या पिढीसाठी झालेल्या कामांचे मोल मोठे आहे.
शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६
पोमलवाडीकरांनीही केले मोठे काम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा